Banking & Finance News : बँकेची बदनामी ही खोडसाळपणाने

वैजापूर मर्चंट-कॉ-ऑप् बँकेचे चेअरमन बाळासाहेब  संचेती यांची पत्रकार परिषद

वैजापूर
बँकेची बदनामी ही खोडसाळपणाने करण्यात येत आहे. जो कोणी ही बदनामी करत असेल त्याला वेळ आल्यावर कायदेशीर उत्तर देखील देऊ अशी माहिती वैजापूर मर्चंट बँकेचे चेअरमन बाळासाहेब (रविंद्र) संचेती यांनी शुक्रवारी (ता.११) एका पत्रकारपरिषदेत दिली. या दरम्यान त्यांनी बँकेचा वार्षिक ताळेबंदही  वाचून दाखविला.



 
या पत्रकारपरिषदेत चेअरमन बाळासाहेब संचेती यांनी वैजापूर मर्चंट कॉ-ऑप्- बँकेच्या स्थापनेपासून ते आजतागायतची वाटचालीबाबत माहिती देत सांगितले की, सन १९५९ मध्ये स्व.बन्सीलालजी संचेती यांनी १७ हजार रूपयांच्या भागभांडवलासह मर्चंट-कॉ-ऑप् बँकेचे छोटेसे रोपटे लावले. त्या रोपट्याचे आज वटवृक्ष झाले असून आजमितीस बँकेत एकूण ५४० कोटी २६ लक्ष रुपयांच्या ठेवी आहेत. १९० कोटी ३० लक्ष रुपयांची गव्हर्मेंट सिक्युरिटीज मध्ये गुंतवणूक आहे. ३८१ कोटी ६५ लक्ष रूपये कर्ज वाटप असून एनपीए (९० दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी परतफेड न झालेले अथवा ज्या कर्जाचे व्याज आणि मुद्दल वेळेवर भरले नाही) मात्र २.५४ (लेखापरिक्षणात ३.९६%)टक्केच आहे. याशिवाय बँकेला १ कोटी ६४ लाख ५५ हजार रुपये इतका निव्वळ नफा झाल्याची माहिती दिली. दरम्यान मागील २० वर्षांपासून बँकेत निवडणूक न होणे हे बँकेच्या सभासदांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाची पोचपावतीच असल्याचे त्यांनी या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. पत्रकार परिषदेला बँकेचे संचालक उल्हास ठोंबरे, प्रशांत त्रिभुवन, प्रशांत सदाफळ, अँड प्रमोद जगताप मर्चंट बँकेचे वरिष्ठ शाखाधिकारी अशोक कोठारी, बाळासाहेब तांबे आदींची उपस्थिती होती.


जून महिन्यात बँकेचे लेखापरिक्षण.....

वर्षभरात होणाऱ्या शासकीय त्रैमासिक लेखापरिक्षण (Audit) हे जून महिन्यातच झाले असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान लेखापरिक्षण व त्या संबंधीच्या बाबी या एक कायदेशीर व निरंतर चालणाऱ्या बाबी आहेत. मात्र कुणी जर या बाबींचे भांडवल करून खोडसाळपणाने बँकेची बदनामी करत असेल तर वेळ आल्यावर त्यांना नक्कीच कायदेशीर उत्तर देणार असल्याचे संचेती यांनी यावेळी स्पष्ट केले.


२४० तरुण बँकेत नोकरीला..

पत्रकार परिषदेत बँकेचे चेअरमन बाळासाहेब संचेती यांनी कुणाचेही नाव न घेता 'लोकांनी बाजार समिती हातात असताना स्वतःची मुलं तिथं कामाला लावली.' असे सांगत मात्र आम्ही कुठलीही लालसा न ठेवता 'मर्चंट कॉ-ऑप्' बँकेसारख्या मोठ्या संस्थेत सर्व घटकातील २४० तरुण नोकरीला लावले. त्यामुळे बँकेचे खातेदार असो अथवा ठेवीदार त्यांचा संचालक मंडळावर पूर्णपणे विश्वास असल्याचे सांगितले.